Homeब्लॉगज्ञान....!

ज्ञान….!

डॉ. रुपेश पाटकर
……..
शाळेत असताना निबंध लेखन हा एक विषय असे. अगदी दुसरीत असल्यापासून निबंध लिहिणे सुरू होई. दुसरी व तिसरीत हे फार सोपे असे. कारण निबंध लिहिणे म्हणजे माहिती लिहिणे असे. गाईवर निबंध असेल तर गाईला पाय किती, शिंगे किती, शेपट्या किती, रंग कोणते वगैरे प्रश्नांची उत्तरे लिहिली की झाला निबंध तयार. चौथीपासून मात्र या वर्णनापेक्षा अधिक अपेक्षित असे. पण ते नक्की काय, हे मात्र समजत नसे म्हणा किंवा सुचत नसे म्हणा. चौथीत असताना आमच्या मुख्याध्यापकांनी मुलांसाठी असलेल्या एका मासिकातील एका विद्यार्थीनीची रोजनिशी वाचून दाखवली होती. तिने खूप आकर्षक पद्धतीने लिहिले होते. मला तिचा हेवा वाटला. आपला निबंध तिच्यासारखा कसा होईल, याचा विचार करत असताना आमच्या गुरुजींनी सल्ला दिला की निबंधात मोठ्या नेत्यांचे सुविचार मांडले तर निबंध आकर्षक होतो. त्याप्रमाणे मी सुविचारांचे पुस्तक आणून वाचू लागलो. त्यात स्वामी विवेकानंदांचे काही सुविचार होते. मला ते खूप वेगळे वाटले. म्हणजे मला ते धार्मिक वाटले नाहीत. मला अजूनही ते सुविचार आठवतात. एक सुविचार होता, ‘जुना धर्म सांगतो ज्याचा देवावर विश्वास नाही तो नास्तिक, नवा धर्म सांगतो ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक!’ दुसरा सुविचार होता, ‘सर्व शक्ती तुमच्यातच विराजमान आहे, तुम्हाला काहीही अशक्य नाही!’ तिसरा सुविचार होता, ‘मी नव्हे, तू!’ चौथा सुविचार होता, ‘मी त्या परमेश्वराचा सेवक आहे, ज्याला अज्ञानी लोक ‘मनुष्य’ म्हणतात!’ ही वाक्ये मला धार्मिक वाटत नव्हती. मला ती बरीचशी प्रोत्साहन देण्यासाठी बोलतात तशी वाटत होती.
“म्हणजे विवेकानंद काय म्हणत होते?” मी बाबांना विचारले.
“ही वाक्ये धार्मिक वाक्येच आहेत. ती स्वामीजींच्या ज्या लेखांतून घेतली आहेत, ते लेख तू वाचलेस तर तुझ्या लक्षात येईल,” बाबा म्हणाले. पण मी ती वाक्ये कोणत्या लेखातील आहेत हे शोधावे कसे हा माझ्यापुढ्यातला प्रश्न होता. मी शाळेत शिकत असल्याचा काळ आजच्यासारखा ‘गूगल सर्च’चा काळ नव्हता. आणि भाषा विषयातील निबंधासाठी ते शोधण्याचा उत्साह माझ्यात दीर्घकाळ राहणार नाही, हे देखील बाबांना ठाऊक होते. म्हणून तेच म्हणाले, “गीतेच्या तेराव्या अध्यायात भगवान म्हणतात,
अर्जुना या शरीरास म्हणती क्षेत्र जाणते!
जाणे हे क्षेत्र जो त्यास क्षेत्रज्ञ म्हणती तसे!!
या श्लोकाचा अर्थ तुला कळला तर स्वामीजी काय सांगतात ते कळेल.”
मला या श्लोकात न समजण्यासारखे काही वाटले नाही. देह म्हणजे क्षेत्र आणि आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ. पण हे माहीत असूनदेखील मला त्याचा आणि स्वामीजींच्या सुविचारांचा संबंध लक्षात येईना.
बाबा म्हणाले, “आपण जेव्हा ‘मी’ असे म्हणतो तेव्हा कशाबद्दल म्हणत असतो?”
“माझे शरीर आणि माझे मन!”
“पण तेराव्या अध्यायात भगवान जे सांगत आहेत ते वेगळे आहे. ते समजण्यासाठी तुला थोडा विचार करावा लागेल. आपल्यासमोर टेबल आहे. तुला ते दिसतेय. कशामुळे दिसतेय?”
“डोळ्यांमुळे!”
“डोळे हे बघण्याचे इंद्रिय आहे. डोळ्यांना फक्त टेबलच दिसतेय का?”
“नाही. अनेक गोष्टी दिसत आहेत.”
“बघणारे इंद्रिय एक, पण त्याला दिसणार्‍या गोष्टी अनेक. बघणारे इंद्रिय स्थिर, पण दिसणार्‍या गोष्टी वेगवेगळया. आणखी एक फरक. बघणारे डोळे आणि दिसणारे दृश्य हे एकच नाहीत. या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. यालाच दृकदृश्य विवेक म्हणतात.
बघणारे डोळे स्वतःला पाहू शकत नाहीत. पण समोर येणार्‍या प्रत्येक गोष्टीला पाहतात. हीच गोष्ट कानांची आणि आवाजांची. हीच गोष्ट त्वचा आणि स्पर्शाची.
आता मला सांग, तुझ्या डोळ्यांना काय दिसतेय ते तुझ्या मनाला कळते की नाही?”
“हो!”
“म्हणजे मन बघणारे आणि डोळे दिसणारे. बघणारे मन आणि त्याला जाणवणारे डोळे एकच आहेत का?”
“नाही.”
“आता मला सांग, तुझ्या मनात काय चाललेय, त्यात कोणते विचार येत आहेत, कोणत्या भावना येत आहेत, हे कळते ना?”
“हो!”
“मनात काय चाललेय हे ज्याला कळतेय, ते मनापासून भिन्न असणार. बरोबर ना?”
“हो!”
“बाहेर काय चाललेय ते डोळे, कान वगैरे इंद्रियांना कळते. इंद्रियांत काय चाललेय ते मनाला कळते. मनात काय चाललेय ते ज्याला कळते, तो खरा मी! तो मी म्हणजे जीवंतपणा.”
“पण बाबा, इतकी डोकेदुखी करणारा विचार कराच कशाला?”
“कारण हा विचार आपल्याला निर्भय बनवतो. मी म्हणजे शरीर नव्हे, मी म्हणजे मन नव्हे, हे कळले की शरीराचा त्रास किंवा मनाचा त्रास म्हणजे माझा त्रास नव्हे, हे लक्षात येते. हे मनात पक्के रुजले की शरीराला किंवा मनाला होणार्‍या त्रासाची भीती वाटत नाही. वेदना होणे (Pain) आणि त्रास भोगणे (Suffering) यात फरक आहे.”
“कसा?”
“जशा बाहेरच्या गोष्टी आणि इंद्रिये या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या एक नाहीत. तसेच इंद्रियांना जाणणारे मन आणि ती इंद्रिये या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या एक नाहीत. तसेच मनात काय चाललेय ते ज्याला कळते तो जीवंतपणा आणि मन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बाहेरच्या गोष्टी जसे पुस्तक, घड्याळ या माझ्या गोष्टी आहेत पण पुस्तक, घड्याळ म्हणजे मी नव्हे. तसेच शरीर, मन या माझ्या गोष्टी आहेत पण त्या म्हणजे मी नव्हे.
मी म्हणजे जीवंतपणा. जीवंतपणा म्हणजे आत्मा! म्हणजेच क्षेत्रज्ञ. हे लक्षात यायच्या आधी माणसाला वेदना (Pain) आणि त्या वेदनेचा मानसिक त्रास (Suffering) होत असतो. पण एकदा हे ज्ञान झाले की क्षेत्र (शरीर व मन) आणि क्षेत्रज्ञ यात भेद आहे, मग माणसाला वेदना जाणवेल पण मानसिक त्रास (Suffering) होणार नाही.
गीतेच्या तेराव्या अध्यायात आणखी एक मुद्दा भगवान सांगतात,
क्षेत्रज्ञ मी चि तो जाण क्षेत्रात सगळ्या वसे!
क्षेत्र क्षेत्रज्ञ भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे!!
म्हणजे प्रत्येक शरीरातील जीवंतपणा म्हणजे भगवान स्वतः आहेत, असे भगवानच निःसंदिग्धपणे सांगतात. माझ्यातला जीवंतपणा म्हणजे परमेश्वर असेल तर ती अनंत शक्तीच माझ्यात वसत आहे. स्वामीजी जेव्हा म्हणतात की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक म्हणजे स्वतःत असलेल्या जीवंतपणावर विश्वास नाही तो नास्तिक. जेव्हा स्वामीजी तुमच्यातच सर्व शक्ती विराजमान आहे असे म्हणतात तेव्हा त्यांना या जीवंतपणातील शक्तीविषयी म्हणायचे असते. स्वामीजी माणसामध्ये दडलेल्या जीवंतपणाला म्हणजेच परमेश्वराला ओळखून त्याची सेवा करा म्हणतात.”
हे ऐकत असताना मला एक प्रश्न पडला की जर प्रत्येकातील जीवंतपणा म्हणजे देव असेल तर दुष्ट लोकातील जीवंतपणा म्हणजे देखील परमेश्वर असेल का?
“होय. कौरवही तोच आणि पांडवही तोच. तुला ताटीच्या अभंगांची गोष्ट सांगतो, म्हणजे लक्षात येईल. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना संन्याश्याची पोरे म्हणून गावातल्या पुरोहितांनी वाळीत टाकले होते. या मुलांचा विटाळ मनाला जाई. त्यांच्या आईवडिलांना पुरोहितांनी मरायला लावले होते. त्यामुळे दुःख झाले तर कुशीत शिरून रडायला आईवडील देखील नव्हते. त्यांच्याशी गावातल्या मुलांनी खेळायला वगैरे येणे दूरच राहिले, आईवडीलाविना पोरक्या झालेल्या त्या मुलांना गावात भिक्षा मागायला गेले तरी टोचून बोलणे ऐकावे लागे. कोणी त्यांना मिळालेली भिक्षा हिसकावून घेऊन धुळीत मिसळत. कोणी त्यांच्या हातातले मातीचे भांडे फोडून टाकत. जिथे गाव पाणी भरी त्या इंद्रायणीच्या घाटावर त्यांना येऊ देत नसत. एक दिवस कोणी पुरोहित ज्ञानेश्वरांना खूपच तुच्छतेने बोलला. ते त्यांच्या जिव्हारी लागले.
तू स्वतःला ज्ञानोबांच्या जागी ठेवून विचार करून बघ म्हणजे त्यांना किती त्रास झाला असेल ते लक्षात येईल.
लोकांनी त्यांना आणि त्यांच्या भावंडाना चांगलं वागवण्याची काहीच आशा दिसेना. पुरती घुसमट झाली त्यांची त्या दिवशी. आणि पुन्हा या दुष्ट जगाचं तोंड बघायच नाही, अशा विचाराने त्यांनी झोपडीच दार (ताटी) लावून घेतले. त्यावेळी त्यांना त्यांच्या धाकट्या बहिणीने मुक्ताईने समजावले. हे समजावताना तिने हाच मुद्दा मांडला. ती म्हणाली, ‘जे त्रास देणारे आहेत, ते कोण आहेत? एक परमेश्वरच अनेक रूपे घेऊन वावरत आहे ना.’
एकापासूनि अनेक झाले! त्यासि पाहिजे सांभाळिले!!
त्या पुढे म्हणतात, ज्यानी तुला त्रास दिला त्यांच्यात तोच परमेश्वर आहे ना, जो तुझ्यात आहे. त्यांनी तुला वाईट बोलणे म्हणजे आपणच आपणास बोलण्यासारखे आहे.
हात आपुला आपणा लागे! त्याचा करू नये खेद!
जीभ दातांनी चाविली! कोणे बत्तीशी तोडीली!!
ऐसे कळले उत्तम! जन तेचि जनार्दन!!”
“मग त्रास देणार्‍यांना काहीच करायचे नाही का?” मी विचारले.
“रामकृष्ण परमहंसांनी याचे उत्तर एका गोष्टीने दिलेय. एका माळरानावर एक विषारी साप राहत होता. तो त्याच्या आसपास येणार्‍या माणसांना, प्राण्यांना चावे. त्याच्या दंशाने अनेक माणसे, प्राणी मेले होते.
त्यामुळे त्याच्या जवळपास कोणी जात नसे. त्याची त्या गावावर दहशत पसरली होती.
एक दिवस त्या गावात एक साधू आला. त्या साधूला गावकर्‍यांनी विषारी सापाची समस्या सांगितली. साधूला साप नियंत्रणात आणण्याचा मंत्र ठाऊक होता. त्या मंत्रामुळे साप साधूच्या नियंत्रणात आला. साधूने त्याला ‘लोकांना न चावण्याचा उपदेश’ केला. त्या दिवसापासून साप कोणालाच चावत नसे. साप चावत नाही असे हळूहळू गावकर्‍यांच्या लक्षात आले. त्यांना सापाच्या जवळ जाण्याची धिटाई आली. आता लोकच त्या निरुपद्रवी झालेल्या सापाला दगड मारून त्रास देऊ लागले. त्यामुळे सापाने बिळाच्या बाहेर जाणे बंद केले. त्याची उपासमार होऊ लागली. तो रोडावत गेला. वर्षभराने तो साधू पुन्हा त्या गावात आला. त्या सापाला शोधत शोधत तो सापाच्या बिळापाशी आला. रोडावलेला साप बघून काय घडले, ते त्याला कळले. तो सापाला म्हणाला, ‘तुला मी कोणाला चावू नको म्हणून सांगितले होते, त्यांना भीती घालू नको असे सांगितले नव्हते. त्यांनी तुला त्रास दिला तेव्हा तू त्यांच्यावर फुसकारायला हवे होते. सर्वात परमेश्वर आहे, हे जाणून कोणालाच त्रास देऊ नये, पण दुसर्‍याने त्रास दिला तर त्रास देणार्‍याने आपल्यापासून दूर रहावे हे बघायला हवे. त्रास देणार्‍याला फुसsss करावे, पण चावू नये!”
…….
डॉ. रुपेश पाटकर

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments