आठवण!
…..
काल रविवार. माझा पेशन्ट बघण्याचा दिवस. एरवी देखील अपाॅईमेंट देऊन मी पेशन्ट बघत असलो तरी माझ्या कुमारवयीन मुलांसोबतच्या आणि काही संस्थांसोबतच्या कामामुळे मला इतर दिवशी पेशन्टना द्यायला खूपच कमी वेळ मिळतो. पण रविवारी मला बर्यापैकी वेळ असतो.
काल दुपारीदेखील माझ्याकडे पेशन्ट होते. काल संध्याकाळच्या शेवटच्या पेशन्टला मी तपासले. ती सुमारे सत्तर वर्षांची, आमच्या शेजारच्या गावची, नऊवारी साडी नेसलेली, आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याचे तिच्या एकंदरीत पेहरावावरुन लक्षात येणारी, निरक्षर बाई होती. मी तिला प्रिस्क्रीप्शन लिहून दिले. ती पहिल्यांदाच माझ्याकडे आली होती. त्यामुळे मी फी घेत नाही हे तिला माहीत नव्हते. तिने फी विचारताच ‘मी फी घेत नाही’ म्हणालो. त्यावर क्षणाचाही विलंब न करता ती म्हणाली, ‘खानोलकर डाॅक्टर असेच होते. ते आमच्या लोकांकडून फी घेत नसत!’ मला बघून तिला डाॅ.खानोलकरांची आठवण आली, हे पाहून आयुष्यातलं सर्वात मोठं समाधान मिळाल्याची भावना मनात आली. सर्वात मोठा पुरस्कार मिळाल्याची भावना म्हणाना. जी बांदा परिसरातील मंडळी आहेत आणि ज्यांना सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी दिवंगत झालेले डाॅ.खानोलकर माहीत आहेत त्यांना मला असे का वाटले ते समजायला कठीण जाणार नाही.
लहान असताना मी स्वतः डाॅ.खानोलकरांकडे पेशन्ट म्हणून अनेकदा गेलो आहे. माझ्या घरात त्यांचा उल्लेख ‘आमचे डाॅक्टर’ असाच होई. ‘डाॅक्टर’ म्हटले की ‘डाॅ.खानोलकर’ असेच समीकरण माझ्या मनात घट्ट बसलेले होते. बहुधा बांद्यातील किमान माझ्या वयाच्या सर्वच लोकांच्या मनात असेच समीकरण असेल.
डाॅ.खानोलकर हे १९४२ ला बांद्यात आले. तेव्हापासून मृत्यूच्या एक वर्ष आधीपर्यंत म्हणजे १९९६ च्या डिसेंबरपर्यंत ते आमच्या गावात प्रॅक्टिस करीत होते. शेवटच्या वर्षात स्ट्रोकमुळे अंथरुणाला खिळल्यामुळे ते पेशंट तपासू शकले नाहीत. अक्षरशः ‘रुग्णसेवा’ हे ध्येयच मनाशी बाळगून त्यांनी आयुष्यभर प्रॅक्टिस केली. आयुष्यभर खादीची शाॅर्ट व इन केलेला खादीचाच शर्ट याच पेहरावात ते वावरले. नेहमी हसतमुख चेहरा. रुग्णाला आश्वस्त करणे म्हणजे काय याचे ते मूर्तिमंत उदाहरण. किमान ऐशी- नव्वद पेशन्ट दिवसाकाठी तपासून देखील ते त्रासलेत, कंटाळलेत असे कधी कोणी पाहीले नाही. आयुष्यात ते कधी कोणावर चिडले असतील असे बिलकुल वाटत नाही. संत एकनाथांचे चरीत्र वाचताना नाथांची न चिडणारी वृत्ती म्हणजे काय असेल, असा विचार करता माझ्या डोळ्यासमोर डाॅ.खानोलकरच येत असत.
गावातील सर्वांचेच ते फॅमिली डाॅक्टर होते म्हणा ना. मी आज सायकीयॅट्रीस्ट म्हणून जे काम करतो, ते त्यांनी फॅमिली डॉक्टर म्हणून आयुष्यभर केले. माझे कुटुंब (अगदी माझ्या आजीआजोबांपासून) घरातल्या अनेक गोष्टीत त्यांचे मार्गदर्शन घेत. आणि न कंटाळता, कोणालाही न टाळता हा माणूस सर्व ऐकून घेऊन चर्चा करी. डाॅक्टर म्हणून दिवसाकाठी किमान पाऊणशे पेशंटना तपासणे आणि संध्याकाळी निवांत बसण्याऐवजी एकदोन पेशंटांच्या घरगुती विषयातही मार्गदर्शन करणे, ते कसे साधत कोण जाणे. शिवाय सायकलने पेशंटच्या घरी जाऊन अंथरुणावर खिळलेल्या पेशंटना व्हिजिटही देत.
हा माणूस पेशन्टांकडून केवळ एक रुपया फी घेई आणि दलितांना पूर्ण मोफत. ती बाईने म्हटलेल्या ‘आमच्या लोकांकडून ते फी घेत नसत’ त्या वाक्याचा अर्थ दलितांकडून प्रॅक्टिसच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी फी घेतली नाही. खादीप्रमाणे हरीजनसेवा हे व्रत घेऊनच ते बेचाळीस साली बांद्यात आले होते.
बाकीच्यांकडून देखील त्यांनी कितीशी फी घेतली? आयुष्यात स्वतः कधी जमीन विकत घेऊ शकले नाहीत, ना स्वतःचे घर बांधू शकले. विरंगुळ्यासाठी ते कुठे फिरायला गेल्याचे मी ऐकले नाही.
पण त्यांच्या जाण्यानंतर आज अठ्ठावीस वर्षांनी त्यांची आठवण जर एका निरक्षर बाईला उत्स्फूर्त होत असेल आणि त्यांच्याबाबतचा कृतज्ञ भाव तिच्या डोळ्यात दिसत असेल, तर त्याच्याशिवाय मोठे कर्तृत्व ते कोणते?
आज आमच्या आजूबाजूला डाॅ.खानोलकरांसारखी करुणामय माणसे दुर्मीळ झाली आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बदमाशांचीच होर्डिंग्ज नजरेसमोर येत आहेत. याचा परिणाम माणसाच्या चांगुलपणावरचा आमचा विश्वास उडण्यात होत आहे. तुम्ही कोणाशीही बोला. ‘आजकाल चांगले राहून चालत नाही’ असा सल्ला देणारी माणसे तुम्हाला मिळतील. स्वतःपलिकडे जाऊन गांजलेल्याला मदत करण्याचे सोडाच, स्वतःपलिकडे जाऊन गांजलेल्यांना मदत करा, असे गप्पात सुद्धा लोकांना बोलावेसे वाटत नाही. अशा पराकोटीच्या आत्मकेंद्रित काळात जेव्हा डाॅ.खानोलकरांसारख्यांची आठवण निघते, तेव्हा ते स्मरण माझ्यासारख्याच्या मनासाठी गंगाजलाने आंघोळ करण्यासारखे वाटते!
…..
डॉ. रुपेश पाटकर


