भगवान शेलटे :
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है…!
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है…!
सध्या रिफायनरीच्या विरोधात कोकण तापलय. कोकणच्या लाल मातीला आपल्या आईसारखं जपणाऱ्या कोकणातल्या बारसु सोलगावच्या आया बहिणी तळपत्या उन्हात आज आपल्या जमिनीला घट्ट छातीशी धरून आहेत. या लाल मातीचा लिलाव करणाऱ्या दलालांना आणि राजकारण्यांना त्या टाहो फोडून सांगत आहेत, पैशांसाठी आमच्या आईची विक्री करणाऱ्या आमच्या औलादी नाहीत. ज्या मातीनं आमच्या कित्येक पिढ्या पोसल्या ती आई आज संकटात असताना, तिला मिळवण्यासाठी गिधाड तुटूण पडली असताना तिच रक्षण करण हे आमचं कर्तव्य आहे आमचा धर्म आहे.
निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकणाला आज विकासाच्या नावाखाली ओरबाडून खाल्ल जात आहे. कोकणी माणूस ओरडून ओरडून सांगत आहे , बाबानो आमच्या जमिनी घेऊन, इथला निसर्ग नासवून आम्हाला रोजगार नको तुमचा. सुखा समाधानाने दोन वेळचं अन्न देईल इतकी ताकद इथल्या निसर्गात आहे. कोकणी माणसाने उपासमारीने, किंवा कर्जबाजारी होऊन कधी आत्महत्या केल्याच पाहिलं नाही. जे आहे त्यात समाधानी आणि आरोग्यदाई आयुष्य जगणाऱ्या कोकणी माणसाची झोप आज राज्यकर्ते उडवत आहेत.
‘ग्रीन रिफायनरी’च्या गोंडस नावाखाली एका सौदीच्या कंपनीला हि जागा देण्यासाठी राजकारणी आणि प्रशासन हट्टाला पेटलय. हे सामान्यांचं सरकार म्हणणाऱ्यानी, संघर्ष करणाऱ्या आया बहिणींना हुसकावून लावण्यासाठी २ हजार पोलीसांची कुमक तैनात केलीय. सरकार नेमक कोणाचं गरिबांचं कि भांवडलदारांचं हा प्रश्न सारखा डोळ्यासमोर उभा राहतोय. इंग्रजांची राजवट असल्यारखी परीस्थिती आता बारसू – सोलगावमध्ये सध्या दिसत आहे.
जमिनी ताब्यात घेण्यासाठी, आंदोलन फोडण्यासाठी, लोकांना, आंदोलनाच नेतृत्व करणाऱ्यांना त्रास देण्यासाठी सगळ्या यंत्रणा कामाला लागल्याचं चित्र आहे. जमिनीचे दलाल मुजोर होत चालले आहेत. कंपनी त्यांच्यावर लाखो रुपये उधळत असल्याचं दिसतंय. यातूनच शशिकांत वारीसे सारख्या सच्या, निर्भीड पत्रकाराचा खूनहि झाल्याचं दिसून येतय. ऐन्राॅनच्या वेळी अमेरिकेत ऑडीटनंतर एका अधिकाऱ्यांला म्हणे विचारलं होत, कि एवढा पैसा खर्च कसा झाला…? तर त्याच उत्तर बोलक होत. इथल्या राजकारण्यांना शिकवण्यासाठी हा पैसा खर्च करावा लागला. इथही इथल्या राजकारण्यांना आणि दलालांना शिकवण्यासाठी मोठा खर्च झालेला दिसून येतो.
अशा प्रकल्पांना विरोध करून आपल्याला गावाला जपलच पाहिजे. कारण जेव्हा मुंबईत गिरणी संपात गिरणी कामगार देशोधडीला लागला तेव्हा त्याला गावाने, गावच्या शेतीने आधार दिला…ज्यांचं गाव नव्हतं, शेती नव्हती अशां कामगारांनी आपलं जीवन संपवलं होत. इतिहास याला साक्ष आहे.
गाव, जमीन यांच्याशी या राजकारण्यांना काहीही देणघेण नाही. उद्या गाव उध्वस्त झाल्यास हे शहरात नाही तर विदेशात राहायला जातील. मात्र, कोकणातील सामान्य माणसाला त्यावेळी रस्त्यावर याव लागेल. हा धोका कोकणी माणसाने आत्ताच ओळखला पाहिजे.
हे आंदोलन सुरु असताना अनेक बुद्धीजीवी, प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी, सोशल मिडीयावर कोकणच्या जीवावर पैसे कमवणारे, मिरवणारे एक चक्कार शब्द काढत नाहीत हे आपलं दुर्दैव आहे. अशा कातडी बचाव लोकांच्या जीवावर कोकण कधीच नव्हत हे हि तेव्हडचं खर
कोकणाला संघर्ष काही नवा नाही. कोकणासाठी संघर्ष करणाऱ्या त्या शेतकरी, आय बहिणी रणरागिणी, इथल्या मातीवर प्रेम करणारा तरुण कोकणच रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. रिलायन्स पाईप लाईन, कळणे मायनिंग, रायगड सेझ, जैतापूर अणुउर्जा प्रकल्प अशा अनेक विनाशकारी प्रकल्पांना कोकणातल्या निर्भीड लोकांनी प्राणपणाने विरोध केलाय. तेवढ्याचं ताकतीने रिफायनरीचं संकट सुद्धा परतवून लावू यात शंका नाही.
खरतर निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकणात इथल्या उत्पादित मालावर प्रक्रिया करणारे लघु उद्योग न आणता कोकण भकास करणारे प्रकल्प राजकारणी आपल्या माथी का मारत आहेत हेच कळत नाही. पैशांचा हव्यास एक दिवस कोकणचं अस्तित्वच नाहीस करेल हे त्यांना कोण सांगणार…?
आज खऱ्या अर्थाने बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांची आठवण येते. आज कोकणचं रक्षण करण्यासाठी जो संघर्ष सुरु आहे, त्यांनी अशी वेळच येऊ दिली नसती. कारण, हे राजकारणी इथल्या लोकांसाठी काम करत होते, कुठल्या भांडवलदार कंपनीसाठी नाही. त्यांनी अभ्यास करून पहील्यांदाच अशा विनाशकारी प्रकल्पांना विरोध केला असता हे हि तेवढच खर आहे.
शेवटी जाताजाता एक सांगावस वाटत आज बारसू सोलगाव वाले जात्यात आहेत आणि आम्ही सुपात. त्यामुळे सुपातले जात्यात जायला वेळ लागणार नाही हे सत्य नाकारून चालणार नाही. इथं क्युबाचा महान क्रांति
कारक चे गव्हेराच एक वाक्य आठवत. चे म्हणतो ‘‘ मैने कब्रिस्तान में ऊन लोगोंकी कब्रे देखी है, उन्होने इसलिये संघर्ष नाही किया कि कहि वे मारे नही जाएं..!
भगवान शेलटे


